Saturday, 6 February 2016

ABHINAV KALAMANCH: नववर्षकवेत घेऊन सूर्य कोवळानववर्षाचा नव दिन आला...

ABHINAV KALAMANCH: नववर्ष

कवेत घेऊन सूर्य कोवळा
नववर्षाचा नव दिन आला...
: नववर्ष कवेत घेऊन सूर्य कोवळा नववर्षाचा नव दिन आला साद घालतो गिरीशिखरातून वाऱ्याच्या त्या मंद स्वरांनी शिंपित येतो पानोपानी मंद सुगं...

Wednesday, 20 January 2016

नववर्ष

कवेत घेऊन सूर्य कोवळा
नववर्षाचा नव दिन आला

साद घालतो गिरीशिखरातून
वाऱ्याच्या त्या मंद स्वरांनी
शिंपित येतो पानोपानी
मंद सुगंधित तो दव ओला

उठा उठा हो पृथ्वीवासी
नका म्हणू आलिया भोगासी
पळ पळ समजा दान सृष्टीचे
खेळ जुनाच, नव्याने खेळा

दु:ख , भ्रांत हे नित्य सोबती
त्यांच्यासाठी रडा कशाला
कुणी समजते जीवन रण हे
कुणी मानते त्यास प्रशाला

निमित्त कसले नववर्षाचे
तुमच्यासाठी रोज नवा मी
करा साजरा मनापासुनी
हास्य राहूदे अन साथीला

----श्री संजय माने ., महाड
      ९४२०३२४०२२
मराठी माय माझी 

नका बाळगू हो खंत वंचनेची
नको ती कदा भूमिका याचकाची
जिंके लीलया जी पैज अमृताची
ऐश्वर्यसंपन्न मराठी माय माझी

दुध वाघिणीचे जरी इंग्रजी ते
जरुरीच आहे हे दुध माउलीचे
लेकरांच्या भल्यासाठी उपेक्षाही सोशी
मोठ्या मनाची मराठी माय माझी

लौकिक साऱ्या जगतात आहे
अलंकार नाना जिच्या संग्रही
बाळगे कधी ना तमा ती कुणाची
गर्विता रुपाची मराठी माय माझी

कितीएक आल्या , किती लुप्त झाल्या
राजाश्रयाने तरल्या किती
भीती ना तिला हो कधी संपण्याची
श्वासात वसते मराठी माय माझी

----श्री . संजय माने ,महाड
       ९४२०३२४०२२
मार्ग यशाचा 

यश मिळते
जेव्हा श्रमतो मीही
मनापासुनी
हरणे ,उठणे याहून आणिक नसते काही

यश मिळते
जेव्हा पुसून ओळख
उतरतो रणी
येता अपयश
मीच एकटा धनी ,दुसरा कोणी नाही

यश मिळते
जेव्हा कळते मज
मर्यादा माझी
ओळख परक्यांची होते अन माझी मलाही

यश मिळते जेव्हा
आठवतो मी माझे स्नेही
त्यांच्यावाचून जमले नसते मजला काही

-----श्री . संजय माने ,महाड
            ९४२०३२४०२२
चर्वण 

चरता चरता बैल म्हणाला गाईला
घोळ कधी इतका नव्हता मी पहिला 
भा - गवताचे करिता चर्वण मी दाती 
छपन्न इंचांची झाली माझी छाती 
प्रश्न तरी हा सतावितो ग मज आता 
कशास माणूस म्हणतो तुजला गोमाता 
दुध ना वर्ज्य असो म्हैस वा असो गाढवी 
त्यांस ना म्हणतो माता,कोण त्याला अडवी
लज्जित होते रोज तयांची माता, मुलगी 
सहन कशाला करते तुही त्यांची सलगी 
नावच यांचे पहिले बघ प्राण्यांची यादी 
पशुत्व केवळ उरते यांचे पाहून मादी 
सारे प्राणी झाले आजवर भक्ष्य जयांचे 
तुझ्या रक्षणासाठी सैनिक दक्ष तयांचे
कळू न येता वळू कसे ते येईल आता 
गोमाता माता म्हणता म्हणता होतील "वळू "च आता … 

श्री . संजय माने , महाड ९४२०३२४०२२ 

Thursday, 6 March 2014

लोकशाही

लोकशाही

ठराविक लोकांनी
ठराविक लोकांसाठी राबवलेली
ठराविक लोकांची सत्ता
म्हणजे आमची लोकशाही

जिथे प्रामाणिकपणाचा बैल रिकामा
जिथे अडाणीपणाच येतो कामा
जिथे जातीयवादाला आरक्षणाचा मुलामा
ती म्हणजे आमची लोकशाही

जिथे आरोपांची खंत नाही
जिथे अपिलाना अंत नाही
जिथे आंदोलनांना उसंत नाही
ती म्हणजे आमची लोकशाही

युवा पिढी इंटरनेटच्या जाळ्यात फसली
मार्गदर्शक पिढी वृद्धाश्रमात बसली
बालकांची पिढी संस्काराला मुकली
आता कोण चालवणार हि आमची लोकशाही ?

कवी -- संजय माने ,महाड 

Thursday, 23 January 2014

चला लिहू या

चला लिहू या
शुभेच्छा द्यायच्या म्हटल्या
की लगेच एसएमएस पाठवतो आपण
मनातल्या भावना कधी कागदावरही उतरवू  या
मेल बॉक्स भरला की
जुने  एसएमएस डिलीट करतो आपण
आपल्या माणसांचे आपुलकीचे शब्द
पत्ररूपाने साठवू या
नेट वरल्या अनोळखी मित्रांशी
काहीबाही शेअर करतो आपण
आपल्या जगण्यातली सुख दुखः
आपल्या माणसांपर्यंत पोहोचवू या
आपल्या फोटोला किती लाइक्स आले
किंवा आपल्या फोटोवर किती कमेंट्स आल्या
यापेक्षा धीराचे चार शब्द आणि कौतुकाची थाप
आपल्या माणसा पर्यंत पोहोचवू या
इ मेलने निरोप सेकंदात पोहोचतात
पण माणसांमधल अंतर कमी नाही होत
चला लिहू या
माणुसकीचा ओलावा आणि पोष्टाची सेवा
दोन्ही चिरकाल जिवंत ठेवू या

कवी -- संजय माने ,महाड

Thursday, 28 March 2013

अरे गुलामा …
गुलाम मेला म्हणतो कसा ,
आती क्या खंडाला
लाज तरी कशी वाटत नाही
म्हटलं चांडाळा ?
बेकारीचा घेतलाय वसा ,
बापाचा पैसा घटवायला ,
कॉलेजला हा जातो जातो जणू ,
केवळ पोरी गटवायला
स्टायलिश कपडे , डोक्यावर टोपी ,
दाढीचे खुंट वाढलेले
बस स्टोप वरती फिरतात जसे
बोकड देवाला सोडलेले ……

कवी -- संजय माने ,महाड 

Saturday, 4 August 2012

चारोळी
स्पंदनांचे जाळे  , फेकुनी आकाशी
स्वप्नांचे थवे घे तू ,ओढुनी  उराशी
तिमिरास  तेजाची  ,दावूनी लकाकी
तुझ्या साठी उषा आली ,हास ना जराशी

----संजय माने ,महाड 

जगेन मी

हसून साह्शील सहज वेदना
दु:खlला  सुख म्हणेन मी

तू चंद्राला दिनकर म्हणशील
तुझ्यासवे "मम" म्हणेन मी    

अर्थ नवा नात्याला देशील
श्वासाविनही जगेन मी  

स्वप्नांमध्ये रंग तू भरशील
नेत्रांविनही बघेन मी   

मागून बघ तू सहज एकदा  
चंद्र धरेवर  आणेन मी

प्रीतीस म्हणते नश्वर दुनिया 
सखी तुला मग  म्हणेन मी

---संजय माने ,महाड 

Saturday, 7 January 2012

चारोळ्या

धन्य त्या शिवबाची
ज्याने प्राण देशासाठी वाहिला,
आम्ही मात्र जितेपणी
देश गुलाम होताना पाहीला.
----------------------------------------
इथल्या चिरेबंदी दगडांनी
इतिहासाची जुळणी केली,
भूखंड खाऊन पुढा-यांनी
इतिहासाची गुळणी केली.
----------------------------------------
जनतेचाच पैसा खाऊन
वर "कोण म्हणतो येणार नाय "
लोकशाहीच कवच पांघरून
कासव घेतो पोटात पाय.
----------------------------------------
कवी -- संजय माने ,महाड 

माझं स्वप्नं

मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू , तोच मी ,
डोळ्यातून बोलणारी ,
स्पर्शातून फुलणारी ,
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती,
सुखदु:खाच्या चार भिंती,
आपल्या छोट्याशा  विश्वाची,
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात  ,
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं ,
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं,
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या,
प्रेमाचा अंकुर फुलू दे.

कवी -  संजय माने , महाड .      

सोनेरी पहाट

चुरगळता पाचोळा
त्या कोमल पायांखाली
रान पाखरानाही
जाग पहाटे आली
पाहुनिया लावण्य
अवघडल्या दिशा दाही
या निर्विवाद विजयाची
पैजण देती ग्वाही
रोखला श्वास वा-याने
स्तब्ध झाल्या वृक्षवेली
उतरता वल्कले तिने
पुर्वाही लज्जित झाली
गौरकायेच्या स्पर्शाने
स्तब्धता तळ्याची हलली
वलयांकित जादूची
कंपने जळात उसळली
या नाजूक अन्यायाला
कोकीळ फोडी वाचा
बावरल्या नजरेने
वेध घेतला स्वरांचा
अधि-या रविकिरणांनी
थोडीशी आगळीक केली
जाणुनिया मर्यादा
लाजाळूची पाने मिटली .
 
       कवी - संजय माने ,महाड  

क्षण प्रीतीचे

धुंद आसमंत ....
अथांग सागर.....
ओठांच्या किना-यावर आदळणा-या ,
उसळत्या यौवनाच्या लाटा,
स्वैर मनातून भावनांना ,
अभिव्यक्तीच्या हजार वाटा.
एकमेकांत सामावण्याची
एक अनामिक ओढ,
वासनांचे वादळ ,
भावगर्भ डोळे,
जोडत होते निशब्द नाती ,
अस्तित्व विसरायला लावणा-या,
सहवासातील प्रत्येक क्षणाच ,
सार केवळ एकचं........प्रीती.
व्यापून राहिलीय जणू ,
या विश्वाच्या अंती अनंती.

कवी.- संजय माने, महाड 

Sunday, 1 January 2012

नव वर्ष स्वागताचा थरार

                                     ३१ डिसेंबर २०११ . २०१२ च्या स्वागताचा दिवस. सकाळपासून २०१२ च स्वागत कोणत्या पद्धतीन कराव याचाच विचार करत होतो. पारंपारिक पद्धतीन नवीन वर्षाच स्वागत करायचं नव्हत. आणि दारू किंवा इतर कोणतंही व्यसन नसल्यान अशा ग्रुप मध्ये मी कधीही जात नाही. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर नव वर्षाच स्वागत समुद्रात फिरून कराव  अस नक्की केल. त्या करिता चांगल्या बोटीचा शोध सुरु झाला. कुटुंबासोबत  रात्रीचा प्रवास करायचा असल्याने मोठी बोट हवी होती. ब-याच प्रयत्नानंतर प्रवासी वाहतूक करणारी लॉंच मिळाली. हि लॉंच मिळवून देण्यासाठी धावपळ करणा-या इसमानेच आम्हाला  एक सल्ला दिला. जवळच समुद्रात एक छोटस बेट आहे तिथे तुम्हाला रात्री कार्यक्रम साजरा करता येईल अस त्याच म्हणण होत. मी ते मान्य केल. पण त्या बेटावर जाण्यासाठी आणखी एका छोट्या होडीची गरज होती. तीही त्यानेच उपलब्ध करून दिली. एव्हढंच नाही तर त्या बेटावर पूर्ण अंधार असल्याने जनरेटर आणि म्युझिक सिस्टीम सुद्धा त्यानेच उपलब्ध करून दिली.
                                      एव्हढी सगळी तयारी झाल्यावर मी घरी आणि माझ्या दोन मित्रांना माझा बेत सांगितला. त्यांनीही कुटुंबासोबत येण्याची तयारी दाखवली. मग जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची तयारी करून संध्याकाळी आम्ही श्रीवर्धन हून दिघी या गावाकडे निघालो. रात्री ९-०० वाजता आम्ही लॉंच  मध्ये चढलो. आमचा प्रवास सुरु झाला पण कुठे जायचं याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती , तिथे काय आणि कशी परिस्थिती असेल याचाही अंदाज नव्हता. खलाशांच्या म्हणण्यानुसार साधारण १० मिनिटांत आम्ही बेटावर पोहोचणार होतो. सोबत छोटी होडीही होती. पण अंधारात त्यांचाही अंदाज चुकला आणि तब्बल दीड तासानंतर आम्ही त्या बेटाच्या जवळ पोहोचलो. तिथून छोट्या होडीतून त्या बेटावर एक एक जण तराफ्याने पोहोचलो. आणि तिथले वातावरण पाहून सगळेच खुश झालो. आमच्या आधीच खलाश्यांनी तिथे जाऊन जनरेटर लाऊन ट्युबलाईट चालू केल्या होत्या. चारही बाजूनी समुद्राचे अथांग पाणी आणि बेटावर आम्ही. माझ्या दिवसभराच्या मेहनतीच चीज झाल्यासारखं वाटल . समुद्रातून बोटीचा प्रवास आम्ही अनेकदा केला होता. पण समुद्रातल्या एका निर्जन  बेटावर रात्र घालवण्याचा अनुभव थरारक होता हे मात्र निश्चित .
                                     जेवण झाल्यावर डि जे चालू करून आम्ही मनसोक्त नाचलो . रात्रीचे दोन अडीच कधी वाजले   ते कळलेच  नाही. खरतर आम्ही खलाश्यांना केवळ जेवण करून निघणार असंच सांगितल होत. पण त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. उलट आणखी कशाची गरज लागणार आहे का ते विचारत होते. पण त्यांच्या चांगुलपणाचा आणखी गैर  फायदा घेणे आम्हाला बरोबर वाटले नाही. आम्ही अडीच वाजता निघालो. मात्र त्या नंतरही त्यांनी आम्हाला दिघी पोर्ट या मोठ्या बंदराचा फेरफटका मारून आणले . काहीही ओळख देख  नसताना  आमच्यासाठी दिघी गावातील  त्या आठ दहा माणसांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू.
                                     परत निघताना  आम्हा सर्वांच्याच चेह-यावर भरपूर समाधान होत. नव वर्षाच्या स्वागताचा हा थरार  आम्ही कधीही विसरणार नाही हे मात्र नक्की.

------संजय माने ,महाड 

Friday, 30 December 2011

आदर्श

हे शिवराया,
सह्याद्रीच्या कडेकपारीत  फिरून  
स्वराज्यावर  पहारा दिलास खरा ,
पण रेशनच धान्य खाऊन
आमच्यात एव्हढी ताकद कशी यायची  ? 
नशीब रोप वे आहे म्हणून,
नाहीतर तुझी गाठभेट
फक्त पुस्तकातच व्हायची .
तुझं चरित्र वाचून
कधी कधी बाहुना  स्फुरण चढते,
पण "अहो नळाला पाणी आलंय" म्हणत 
बायको हाती बादल्या देते.

साहेबाच्या आदेशाशिवाय 
लेखणीही न चालविणारे कारकुंडे आम्ही,
तलवार काय चालविणार ? 
तुझ्यासारखा बंडखोरपणा 
आम्हाला नाही बुवा जमणार,
कारण मेलेलं मन हे 
नोकरीच क्वालिफिकेशन आहे,
देशाची चिंता करत बसणे ,
ऑफिसच्या नियमांविरुद्ध आहे.

यवनांना  तलवारीच  पाणी पाजून ,
तू तुझं नाव अजरामर केलंस,
पण आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही,
बघ प्रत्येक खडकावर 
बदामाच्या आकारात ,
आमच्या प्रेयसींसह
आमची नावं आम्ही,
अजरामर करून ठेवलीत. 

कवी---- संजय माने, महाड 


Wednesday, 28 December 2011

विश्वास ठेव ......

विश्वास ठेव ......
हे प्रितीच बंधन,
मी स्वत:हून  स्वीकारलंय,माझ्यासाठी.
आकाशगंगेत चमचमणा-या,हजारो ता-यां पैकी एक
हि ओळख मला नको आहे.
शतकानुशतके
पृथ्वीभोवती प्रदक्षिणा  घालणा-या
चंद्राचं निस्वार्थी प्रेम मला भावत
अमावस्या किंवा   ग्रहण
हा त्याचा दोष  नाही ,
गैर समजांच्या काळ्या पडद्याआड
पुनर्भेटीचीच  ओढ आहे.
ज्याचा शेवट गोड ,
ते सगळंच गोड आहे.


कवी.--- संजय माने ,महाड